मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी वाढ झाली ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानामुळे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद आज दिवसभर पडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले. एवढेच काय तर खुद्द भाजप नेत्यांनीही त्यांच्या विधानाला असहमती दर्शवली. त्यानंतर आता राज्यपालांनी त्यांच्या या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे.
या संदर्भात त्यांनी ट्विट करत त्यांचे मत मांडले आहे. राज्यपालांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, “काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.”
पुढे ते असेही लिहले, “महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. त्यामुळे कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.” तर अशा शब्दात त्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देत आज दिवसभर उठलेले राजकीय वादळ थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता तरी त्यांच्यावर सुरु असलेली टीका थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल केलं होत.
This news is co provided by Janpratisadnews