भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारताची धावसंख्या 8 बाद 289 धावा इतकी आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने वनडे कारकिर्दीतील त्याचे पहिले शतक झळकावले आहे. त्याने 82 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर 97 चेंडूत 130 धावा केल्यानंतर ब्रॅड इव्हान्सने त्याला बाद केले. सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. मात्र ब्रॅड इव्हान्सने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने 30 धावा करून पूर्णपणे सेट झालेला कर्णधार केएल राहुल याला क्लीन बोल्ड केले. केएल राहुलनंतर ब्रॅड इव्हान्सने शिखर धवनलाही बाद केले. 40 धावा केल्यानंतर गब्बरने मारलेला चेंडू थेट शॉन विल्यम्सच्या हातात जाऊन विसावला. त्यानंतर आलेला इशान किशन 50 धावा करून धावबाद झाला. त्याच्या वनडे कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक आहे. इशान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला दीपक हुडा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि अवघी 1 धाव काढून तोही ब्रॅड इव्हान्सचा बळी ठरला. त्यांनतर आलेल्या संजू सॅमसनने 13 चेंडूत 15 धाव केल्या. तर ऑल राउंडर असलेला अक्षर पटेलही केवळ एका धावेतच बाद झाला.
यानंतर सर्वांना शेवटची आशा होती ती शार्दूल ठाकूरकडून. शार्दुलने 9 धावा केल्या आणि तोही बाद झाला. यानंतर दीपक चाहर आणि कुलदीप यादव या दोघांनी मिळून 3 धाव केल्या आणि ही इनिंग्स संपली. तर आता भारताने 8 बाद 289 धावा केल्या आहेत. त्यामुळे हि धावसंख्या झिम्बाब्वेचा संघ पार करणार का की टीम इंडिया झिम्बाब्वेला व्हाईट वॉश करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.