सांगलीतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक माणिकराव पाटील यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी अखेर १५ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील पाहणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. सुपारी देऊन माणिकराव पाटील यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक माणिकराव पाटील यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. १३ ऑगस्ट रोजी जमीन दाखवण्याच्या बहाण्याने माणिकराव पाटील यांना तुंग या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यानंतर तेथून त्यांचं अपहरण करण्यात आलं. १७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वारणा नदीपात्रामध्ये आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील आणि वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी येथील १५ संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे ५० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले आहेत. माणिकराव पाटील यांचं अपहरण आणि खून सुपारी देऊन केल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाटील यांचे अपहरण आणि हत्येच्या कारणाचा उलगडा लवकरच होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
This news is co-provided by Janpratisadnews