जन प्रतिसाद न्युज नेटवर्क
(अनिल जोशी )
आज गेली काही वर्षे सांगली कोल्हापुर परिक्षेत्रातील गावांना वारंवार कृष्णा-पंचगंगा-वारणा नद्यांना येत असलेल्या महापूरांना तोंड़ द्यावे लागत आहे . सुमारे ८ ते १० दिवस पुर ओसरण्यास लागतात. सन् १९१४ साली असाच एक प्रचंड मोठा महापुर सांगलीत आला होता. तत्कालीन सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी या महापुराच्या वेळी सांगली शहराचा संपर्क तोडणा-या पूर परिस्थितिचा विचार करून, आपल्या दरबारातील इंग्रज अधिका -यांसाशी विचार विनमय करून सध्याच्या अस्तीत्वात असणा-या आयुर्विन पुलाची संकल्पना उभारण्यात आली आणि पुलासाठी लागणारा खर्च देखिल त्यावेळच्या मानाने प्रचंड होता. इंग्रज अधिका-यांच्या उपस्थितीत सांगली संस्थान विभागाच्या स्टेट असेंब्लीत यावर चर्चा होवून अखेर १९२७ साली यावर महाप्रचंड असा आयुर्विन पुल उभारणेचा प्रस्ताव पास होऊन त्यावर प्रत्यक्ष आयुर्विन पुल उभारणीच्या कामास सुरवात झाली. सर्वसाधारणपणे सदरहू पुल उभारणीचा खर्च ६ लाख ५० हजार इतका होता. सदरहु आयुर्विन, पुलाचे बांधकाम पुण्याचे रानडे अँड सन्स या कंपनीकडे दिले होते तसेच सदरहू, आयुर्विन पुलाची देखरेख तत्कालीन सांगूली संस्थानचे इंजिनियर श्री भावे व प्रमुख सल्लागार, मुंबई विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता श्री व्ही. एन. वर्तक यांचे अधिपत्याखाली झाली. सदरहु पुलाचा पाया खुदाई राजे चिंतामणराव पटवर्धन यांचे हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी व १६ एप्रिल १९२७ रोजी श्रिमंत राजे चिंतामणराव पटवर्धन आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. या आयुर्विन पुलाच्या बांधकाम उभारणीस २ वर्षे ९ महिने असा कालावधी लागुन अखेर भव्यदिव्य सुंदर पुल बांधुन तयार झाला. सन १९१४ साली आलेल्या महापुराने सांगली शहर पूर्ण पाण्याने वेढले गेले होते व कित्येक घरे पाण्याखाली जाऊन मदती विना नागरीकांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या यांचे शब्दात वर्णन फारच अपुरे आहे. आजही महापुर आला कि सांगली शहरात प्रामुख्याने आयुर्विन पुलानजीकच्या पाण्याच्या पातळीचा विचार करणे महत्वाचे ठरले आहे. असा हा सांगलीचा अव्दितीय संस्मरणीय आयुर्विन पुलाचा ठेवा महाराष्ट्र शासनाने सुस्थितीत ठेवणे हे आज महत्वाचे ठरणार आहे.