अजित पवार म्हणाले कि, ऑलिम्पिंकमध्ये किंवा इतर खेळात जे खेळाडू सर्वोच्च कामगिरी करतात त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना सरकारी नोकरीची संधी दिली जाते. त्या खेळाडूंच्या नोंदी ठेवणाऱ्या संघटना असतात. मात्र दहीहंडीची नोंद तुम्ही कशी ठेवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. समजा एखादा गोविंदा शिकलाच नसेल मात्र त्यांने जर या खेळात पारितोषिक जिंकले तर त्याला कोणती नोकरी देणार असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मेळघाटला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. यानंतर पुढे पवार म्हणाले,मुख्यमंत्री झाल्यावर भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. प्रत्येक गोष्टीचे प्लस पॅाइंट मायनस पॅाइंट बघावे लागतात. आलं मनात, अन् केलं जाहीर, असे होत नाही. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांना हे सर्व माहिती आहे. अशा घोषणा करताना त्यांनी तरी विचार केला पाहिजे. कारण गोविंदा पथकातील पोरं किती शिकले आहेत की अक्षिशित आहेत. याचा रेकॉर्ड कसा ठेवणार आदी गोष्टी विचारात घेऊन मग बोलायला पाहिजे. पण गोविंदांना विमा संरक्षण देण्याची बाब पटण्यासारखी आहे.
दरम्यान, काँग्रेसने देखील यावर टीका दिली आहे. युवक काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले कि, सरकारने दहिहंडीचा समावेश हा खेळात केला याबाबत काहीच आक्षेप नाही. मात्र गोविंदाना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे देश आणि राज्यातील बेरोजगारांची सरकारने केलेली चेष्टा असल्याचा घणाघात सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नोकरभरती सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.