राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने सोमवारी रात्री उशिरा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार मध्यरात्री मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यामुळे कामावर जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
This news is co-provided by Janpratisadnews