जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये विश्वजीत फाउंडेशन तर्फे भरवण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेत बदलापूरच्या दत्तकृपा मंडळाच्या धाडसी गोविंदांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या बक्षिसासह प्रथम क्रमांक पटकावला. संपूर्ण तरुण भारत स्टेडियमचा परीसर लेसर किरणांनी उजळून निघाला होता तसेच फटाक्यांच्या अातिषबाजी ने संपूर्ण परिसर दणाणून गेला. पहिल्यापासूनच दत्तकृपा मंडळ बदलापूर मुंबई व वंदे मातरम संघाच्या मध्ये चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीस संघाने दिलेल्या सलामी नंतर दहीहंडी अनुक्रमे पाच फुटाने खाली घेण्यात आली. शेवटी अकराच्या सुमारास सात थर रचत बदलापूर मुंबईच्या दत्तकृपा मंडळाने दहीहंडी फोडण्याचे स्वप्न साकार केले . त्या बरोबरच तरुण भारत स्टेडियम मध्ये गर्दीने भरलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. या कार्यक्रमास माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे बरोबर युवानेते जितेश कदम व चित्रपट अभिनेते रामचंद्रा राजू , मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर, प्रतीक्षा जाधव ,झोया खान, नगरसेवक मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. विश्वजीत युथ फौंडेशनचे अध्यक्ष उदय शिंदे , अमित शहा व विशाल कलघुटगी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
This news is co provided by Janpratisadnews