नव्या सरकारने उत्सवावरील बहुतांश निर्बंध उठविल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असताना अनेक गावांनी पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवला आहे.
नव्या सरकारने उत्सवावरील बहुतांश निर्बंध उठविल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असताना अनेक गावांनी पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील १०८० गावांत 'एक गाव, एक गणपती' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. करोना संसर्गामुळे गेल्या वर्षी हा उत्सवच न करण्याचा निर्णय अनेक गावे आणि सार्वजनिक मंडळांनी घेतला होता. यंदा अशा गावांची संख्या फारच कमी आहे.
दोन वर्षे राज्यावर करोना संसर्गाचे मोठे संकट होते. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांना दोन वर्षे महापुराचा तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी ६४ गावांमध्ये उत्सवाला फाटा देऊन जमा झालेली रक्कम विधायक कामासाठी वापरण्यात आली. यंदा करोनाची भीती कमी झाल्याने सर्व गावांत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा केवळ १५ गावांनी हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११, तर सातारा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश आहे. याशिवाय तीन जिल्ह्यांतील हजारावर गावांत यंदा 'एक गाव, एक गणपती' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या गावांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा २००ने अधिक आहे. हे पुरोगामी चळवळ अधिक घट्ट होत असल्याचे लक्षण मानले जात आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून, ५९३ गावांमध्ये एकच मूर्ती स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवावरील निर्बंध उठवल्याने एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची जोरदार तयारी झाली असताना अजूनही काही गावांनी 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमाच्या माध्यमातून एकीचा संदेश कायम ठेवला आहे, हे कौतुकास्पद आहे. आम्ही अनेक गावांत बैठक घेऊन लोकांना समजावल्याने यंदा अशा गावांची संख्या वाढली आहे.
This news is co-provided by Janpratisadnews