जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्या महाराष्ट्र राज्यात मान्सून सक्रिय नसल्याने ,पावसामध्ये बराच खंड पडला आहे .गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. बुधवार पर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून, गुरुवार -शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार व अति मुसळधार पावसाला सुरुवात होईल असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे .कोकण ,गोवा ,मध्य- महाराष्ट्रात शुक्रवारी तुरळक ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे .अरबी समुद्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून ,वाऱ्याची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सूनचा पूर्वेकडील भाग ,दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून त्याबरोबरच कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वात स्थिती निर्माण होऊन, त्याच्या परिणामा अंतर्गत 48 तासांमध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, याच्या परिणामा अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.